Thursday, February 19, 2026

वा. सी. बेंद्रे आणि कलायोगी कांबळे यांची ऐतिहासिक देणगी: शिवरूपाचा शोध आणि रंगांची साधना

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नाहीत, तर ते एक अजोड दैवत आहेत. रयतेचा राजा, जाणता राजा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून त्यांचे स्थान प्रत्येक मराठी मनाच्या गाभाऱ्यात अचल आहे. शतकानुशतके या महापुरुषाच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या, पोवाडे रचले गेले, आणि इतिहासाच्या पानांवर त्यांच्या शौर्याची नोंद झाली. तरीही, एका प्रश्नाने इतिहासकारांना आणि शिवभक्तांना दीर्घकाळ अस्वस्थ केले होते, तो प्रश्न म्हणजे—"आपले राजे खरोखर दिसायला होते तरी कसे?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे ऐतिहासिक आणि संशोधनपर श्रेय ज्येष्ठ इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांना जाते, तर त्या सत्याला रंगांचे लेणे चढवून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य कोल्हापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार 'कलायोगी' जी. कांबळे यांनी केले.
या दोन दिग्गजांमधील ऐतिहासिक दुवा म्हणून चित्रकार जी. कांबळे यांनी वा.सी. बेंद्रे यांना मे १९८४ मध्ये लिहिलेले एक पत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते. बेंद्रे यांच्या नातीच्या अर्थात साधना बेंद्रे यांच्या संग्रहात हे पत्र आहे. या पत्रातून केवळ एका चित्राचा प्रवास उलगडत नाही, तर त्यामागील संशोधकीय आणि कलात्मक तपश्चर्याही समोर येते. कोल्हापूरात राहत असताना लिहिलेल्या या पत्रात कांबळे यांनी अत्यंत विनम्रतेने कबूल केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ आणि खरे रेखाचित्र मिळवून ते जगासमोर प्रकट करण्याचे संपूर्ण श्रेय हे वा.सी. बेंद्रे यांनाच आहे. विशेष म्हणजे याच पत्रामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटण्याची इच्छा बोलवून दाखवलेली आहे. परंतु संभाजी राजांचे मूळ चित्र त्यांना मिळाले नाही.

मराठी मातीशी आणि भारताच्या भाग्याशी एकरूप झालेल्या शिवरायांचे रूप नक्की कसे असावे, याबद्दल समाजात अनेक तर्कवितर्क होते. अशा वेळी, वा.सी. बेंद्रे यांनी संशोधकाच्या चिकाटीने शिवरायांचे अस्सल समकालीन रेखाचित्र शोधून काढले. हेच रेखाचित्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून चित्रकार कांबळे यांच्यापर्यंत पोहोचले. एका इतिहासकाराने शोधलेले सत्य आणि एका शिवशाहिराने केलेला पाठपुरावा, याला एका प्रतिभावान चित्रकाराची जोड मिळाली आणि इतिहास घडला.

 

 


मात्र, संशोधकाने शोधलेल्या सत्याचे रूपांतर कलेत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. केवळ कल्पनेच्या भरारीवर चित्र काढणे वेगळे आणि इतिहासाच्या पुराव्यांवर आधारित अस्सल चित्र साकारणे वेगळे. जी. कांबळे यांनी या पत्रात आपल्या या पाच वर्षांच्या कठोर साधनेचे वर्णन केले आहे. बेंद्रे यांनी शोधलेल्या त्या मूळ रेखाचित्राचा कांबळे यांनी सलग पाच वर्षे सखोल अभ्यास केला. त्या चित्रातील प्रत्येक रेषा, चेहऱ्यावरील भाव आणि ऐतिहासिक बारकावे तपासून पाहण्यासाठी त्यांनी सुरुवातीला अनेक पेन्सिल स्केचेस तयार केली.
एखाद्या तपस्वी साधकाप्रमाणे पाच वर्षे अभ्यास केल्यानंतरच कांबळे यांनी कुंचला हातात घेतला. या प्रदीर्घ अभ्यासांती १९७४ साली त्यांनी शिवरायांचे ते भव्य तैलचित्र  साकारले, जे आज आपल्याला शिवरायांच्या खऱ्या रूपाची साक्ष देते. हे ऐतिहासिक तैलचित्र त्यांनी १९७४ मध्येच महाराष्ट्र शासनास अर्पण केले. आज शासकीय कार्यालयांपासून ते घराघरापर्यंत, आणि पुस्तकांपासून ते हृदयापर्यंत शिवरायांचे जे अधिकृत, तेजस्वी आणि प्रसन्न रूप आपण पाहतो, ते याच संशोधनाचे आणि कलेचे फलित आहे.
हे पत्र म्हणजे त्या ऐतिहासिक प्रवासाचा एक मूक साक्षीदार आहे. त्यात कांबळे यांनी "शिवरायांचे रूप खरोखर कसे होते?" या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचे श्रेय पूर्णपणे बेंद्रे यांना दिले आहे. इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांची संशोधक दृष्टी आणि जी. कांबळे यांचा कलात्मक संयम यांच्यामुळेच महाराष्ट्राला आणि भारताला आपल्या लाडक्या राजाचे खरेखुरे रूप पाहण्याचे भाग्य लाभले. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले जावे असे हे कार्य आहे, ज्याची साक्ष हे पत्र आजही देत आहे.

--- तुषार भ. कुटे

 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com