Monday, September 30, 2019

गुरुत्वाकर्षण

विश्वात सर्वत्र संचार असणारे व सर्वात प्रभावी बल म्हणजे गुरुत्वीय बल होय. आज आपण सहजपणे 'गुरुत्वाकर्षण' म्हणतो! परंतु, या वैश्विक बलाची शास्त्रीय उकल करण्यासाठी गॅलिलिओ, न्यूटन आणि आईन्स्टाईन या मानवी इतिहासातल्या प्रतिभावान वैज्ञानिकांनी आयुष्यातील अनेक वर्षे घालविली. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाधारित साधनांचा वापर न करता त्यांनी ही उकल कशी केली, याची कहाणी दाखविणारा हा माहितीपट. शोध कसे लावायचे असतात? याची प्रेरणा या माहितीपटातून नक्कीच घेता येईल...!

https://www.youtube.com/watch?v=2_p2ELD7npw 



Wednesday, September 11, 2019

एक छोटीशी बोधकथा

मकरंद आणि विनय दोघे बालपणीचे मित्र. दहावीपर्यंत दोघेही एकाच वर्गात शिकलेले. शिवाय दोघांचे मार्कही जवळपास समान, अर्थात ६५ ते सत्तरच्या मधलेच. परंतु, दहावीनंतर दोघांनीही वेगवेगळ्या वाट निवडल्या.
आज दहा वर्षांनंतर मक्या अर्थात मकरंद आपल्या वडिलांसह वीटभट्टीवर देखरेखीचं काम करतो तर विनय एमपीएससीची परीक्षा पास होऊन पोलीस सब-इन्स्पेक्टर झालाय. त्या दिवशी सहजच गावात दोघांची भेट झाली. इतक्या वर्षांनी शाळेतला मित्र भेटला म्हटल्यावर दोघांनाही फार फार आनंद झाला. मकरंदला मात्र विनयच्या प्रगतीविषयी असूया वाटत होती. त्या भेटीत तो विनयला म्हणाला होता, 'असतो बाबा देव एकेकावर मेहेरबान... म्हणून तू आज पोलीस झालायेस...'


त्याच्या वडिलांना मात्र त्याचे हे बोलणे खटकले. ते म्हणाले, 'बाळा... खरं सांगू का, देव काही त्याच्यावर मेहेरबान नाहीये. जेव्हा तू गणपती अन नवरात्रात रात्री पॅन्ट फाटेस्तोवर नाचत होतास ना, तेव्हा तो अभ्यास करून आपल्या भविष्याची पेरणी करत होता... इतकंच... '

Thursday, July 18, 2019

कोण होते सिंधू लोक?

जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे सिंधू संस्कृती होय. प्राचीन भारतीय लोक खरेच सुसंस्कृत होते, याचा पुरावा ही संस्कृती देते. याच सिंधू संस्कृतीतील अनेक रहस्यांची व प्रश्नांची उकल 'कोण होते सिंधू लोक?' या पुस्तकाने होते. इसवी सन पूर्व तीन हजार वर्षांपूर्वीची हडप्पा व मोहेंजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा आढावा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ .मधुकर ढवळीकर यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. सिंधू संस्कृती, वैदीक संस्कृती, पर्यावरण, कला, स्थापत्य व प्राचीन भारतीय लोकजीवन या सर्वांचा आढावा या पुस्तकात उत्तम रित्या घेतलेला दिसतो. कलियुगाची संकल्पना, सरस्वती नदीची कहाणी तसेच मेलुहाचे रहस्य या मला पडलेल्या प्रश्नांची उकल या पुस्तकातून झाली.


केवळ हडप्पा आणि मोहेंजोदडो हीच सिंधू संस्कृती नव्हती. अशी अनेक ठिकाणे भारतात सुद्धा उत्खननात सापडलेली आहेत. शिवाय या उत्खननातून इतिहास संशोधन कसे करावे, याचीही उत्तम माहिती मिळते. इतिहासाचा खरा आवाका किती मोठा आहे, याची उकलही या पुस्तकातून होते. एकंदरीत पुस्तकातून आपल्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांची कहाणी मन प्रफुल्लीत करणारीच आहे. त्यामुळे इतिहास, पुरातत्व आणि भारतीय संस्कृती बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.

प्रकाशक: राजहंस प्रकाशन

https://www.akshardhara.com/en/itihas-jag/31681-Kon-Hote-Sindhu-Lok-Dr-Madhukar-Keshav-Dhavalikar-Rajhans-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara-9789386628619.html

https://www.rajhansprakashan.com/product/kon-hote-sindhu-lok/

https://www.amazon.in/Hote-Sindhu-Madhukar-Keshav-Dhawalikar/dp/9386628619

Wednesday, July 3, 2019

साहेबांचे महत्वाचे काम

दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. उपप्राचार्य साहेबांच्या केबिनमध्ये बसलो होतो. साहेब आपल्या कामात अतिशय गुंग झालेले दिसत होते. बाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ ऐकू येत होता. साहेबांची सही घेण्यासाठी विद्यार्थी बाहेर ताटकळत उभे होते. त्यांच्यावर खेकसत शिपाई बोलला, 'शांत बसा रे... सरांचं महत्वाचं काम चाललंय!' मग मुलांनी थोडा गोंधळ कमी केला. 

साहेब नक्की काय महत्वाचं काम करतायेत, हे पाहण्यासाठी मी थोडं डोकावून साहेबांच्या संगणकात दृष्टी घातली. पाहिले तर... साहेब आपले मेलबॉक्स उघडून अतिशय तन्मयतेने लेन्स्कार्ट, पैसा बाजार, पॉलिसी बाजार, क्रेडिट कार्ड, नौकरी.कॉमचे मेसेजेस डिलीट करत होते!

Monday, June 3, 2019

मोरांना हवंय हक्काचं निवासस्थान

भंडारा डोंगरावर मोरांची संख्या वाढल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. उन्हाची तीव्रता वाढल्याने व पाणीसाठेही आटत चालल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोराची भटकंती चालू असल्याचे दिसते. मुळातच आपला हा राष्ट्रीय पक्षी लाजाळू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मनुष्य प्राण्याच्या संपर्कात तो सहजासहजी येत नाही. अगदी लहान मुलांनाही मोर दाखवायचा असेल, तर एकतर चित्रात किंवा प्राणिसंग्रहालयात नेऊन दाखवावा लागतो. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास येथे अशी बरीच छोटी-मोठी वने आहेत, जिथे मोरांचा अधिवास दिसतो. कळपाने राहत असल्याने मोरानी जंगल हेच आपले निवासस्थान मानले आहे. असे असले तरी त्यांना आपल्याकडून अजून सुरक्षित अभयारण्य मिळालेले नाही. अनेक ठिकाणी त्यांना इतर श्वापदांचा त्रास सहन करावा लागतो तर काही ठिकाणी तेच मानवी शेतात घुसून नासधूस करतात. आपल्या राष्ट्रीय पक्षाचे संवर्धन करायचे असल्यास त्यांच्यासाठी छोटी का होईना संरक्षित वने तयार करायला हवीत. जिथे अन्न व पाणी या दोन्ही सुविधा त्यांना उपलब्ध होतील. शिवाय दरवर्षी होणाऱ्या स्थलांतराची चिंताही मिटेल.


सोशल मीडिया आणि आपण

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, सोशल मीडिया नुकतंच पसरू लागलं होतं. त्यावेळेस इंटरनेटच्या वेगळ्या वेबसाईट वर आपलं अकाऊंट असतं, ही गोष्टच खूप मन हर्ष करणारी होती. आज जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियातल्या विविध वेबसाईट वर ॲक्टिव दिसतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडिया हे व्यसन बनलेले दिसते. प्रत्येकालाच आपले अस्तित्व दाखवायचेय व त्यासाठी सोशल मीडिया सारखं स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम नाही! अनेक जण तर आजकाल सतत ऑनलाईन असणाऱ्या जिवंत असं मानतात. अगदी रात्री दोन वाजता मेसेज केला तरी तो डिलिव्हर झाल्याचा दिसतो! व्हाट्सअप ,फेसबुकचं स्टेटस, इंस्टाग्राम च्या पोस्ट, ट्विटरचे ट्विट्स यातून आम्ही ऑनलाईन जिवंत आहोत. हे दाखवण्याची धडपड प्रत्येकजण करताना दिसतो. परंतु, प्रत्येक व्यसनाचा अंतर हा वाईटच असतो हे सर्वांना ठाऊक आहे. सोशल मीडियासंबंधी रोज एक तरी बातमी पेपरमध्ये वाचायला मिळते. अगदी कालच एक बातमी वाचली. 'जगावे की मरावे?' असा प्रश्न एका मुलीने इंस्टाग्रामच्या पोलमधून विचारला होता. त्याला 70 टक्के लोकांनी नकारात्मक मत दिले. मग या मुलीने आत्महत्या केली! अशा अनेक नकारात्मक बातम्या वाचायला मिळतात. व्हाट्सअप स्टेटस वरून मारामारी, फेसबुक वरच्या कमेंट वरून धमकावणे, गुन्हा दाखल करणे, अगदी खूनही करणे. अशा अनेक बातम्या रोज वाचनात येत असतात. यावरूनच या सोशल मीडियाचा आपल्या जीवनावर किती अवास्तव परिणाम होत चाललाय, हे ध्यानात येते. संवाद माध्यमे वेगवान आणि प्रभावी होत चालली आहेत. परंतु त्यामुळेच नकारात्मकता फावत चालल्याचे आढळते. खरंतर मानवी स्वभावच असा आहे की, कोणत्याही गोष्टीचं आपण नकारात्मक गोष्टी सर्वात आधी शिकतो. अर्थात सोशल मीडियाही याला अपवाद नाहीच. 



मी अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेलेली पाहिली आहेत. त्यांनी माझं स्टेटस का नाही बघितलं? आणि माझी पोस्ट का नाही लाईक केली? असल्या फालतू गोष्टींवर दिवस दिवस विचार करत बसतात. त्यामुळे वेळ तर वाया जातोच आणि मानसिक ताणाने क्रयशक्तीही कमी होत असते. शेवटी या सर्व गोष्टी आपल्याच नियंत्रणात आहेत. आपण आपल्या सोशल मीडियाच्या वापरावर आणि मुख्यत्वे मन:शक्तीवर ताबा मिळवू शकलो तर सोशल मीडियाला केवळ मनोरंजनाचे स्थान आहे, हे पटवून घेऊ शकतो.

Tuesday, May 28, 2019

गौतमीपुत्र सातकर्णी: एक युद्धाळलेला चित्रपट

सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्षे राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन होय. सातवाहनांचा विसावा राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा सर्वांत पराक्रमी राजा होता. सातवाहनांच्या साम्राज्याचा मोठा इतिहास जुन्नरला असल्यामुळे त्यांचे मोठे आकर्षण मला नेहमीच राहिले आहे. शिवाय इतिहासातला सातवाहन हाच माझा सर्वात आवडता विषय होता व आजही आहे. गौतमिपुत्रा बद्दल इतिहासात अनेक गोष्टी वाचल्या आहेत. याच गौतमीपुत्र सातकर्णी वर 2017 मध्ये एक तेलगू चित्रपट तयार झाला होता. हा चित्रपट बघण्याची संधी नुकतीच मला मिळाली त्याचेच हे विश्लेषण.
प्रथमत: चित्रपट बघताना माझे पूर्ण लक्ष फक्त ऐतिहासिक घटनांवर राहिले होते. त्यामुळे हा चित्रपट केवळ इतिहास आहे, इतकेच माझ्या डोक्यात राहिले. म्हणूनच केवळ इतिहास म्हणून या चित्रपटाची मीमांसा करायला मी सुरुवात केली. पहिली गोष्ट अशी की 58 वर्षांचा नंदमुरी बालकृष्ण हा बिलकूलच गौतमीपुत्र सातकर्णी म्हणून शोभत नाही! त्याची आई म्हणून दाखवलेली हेमामालिनी ही जवळपास त्याच वयाची दिसते. तरीही ही गोष्ट थोडीशी बाजूला ठेवूयात. गौतमीपुत्राने भारतातील अनेक छोटी छोटी राज्य एकत्रित करून सातवाहनांचे मोठे साम्राज्य बनवले होते. ही गोष्ट खरी आहे आणि चित्रपटात येथे चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. कल्याणचे युद्ध जिंकून कल्याणचा राजा सातवाहनांचा मांडलिक होतो व गौतमीपुत्राशीच  नंतर तो दगा करतो. याला ऐतिहासिक आधार मात्र दिसलेला नाही. कल्याणचा राजा म्हणून दाखवलेला मिलिंद गुणाजीचे दर्शन सुखावणारे ठरते. याशिवाय सातकर्णीने स्वतःला 'गौतमीपुत्र' म्हणवून घेणे व स्वतःच्या मुलाला 'वासिष्ठीपुत्र पुलुमावी' हे नाव प्रदान करणे, हे संदर्भ अत्यंत योग्य आहेत. गौतमी बलश्रीची भूमिका हेमा मालिनीने चांगल्या पद्धतीने साकारली आहे. परंतु या भूमिकेला फारसा वाव दिसत नाही. सातवाहन इतिहासात नागनिकेनंतर गौतमी बलश्री ही सर्वात ताकदवान स्त्री होती. त्याचे प्रतिबिंब चित्रपटात दिसायला हवे होते. परंतु, ते तसे दिसत नाही. शिवाय महाराणी वशिष्ठीची भूमिकाही फारशी प्रभाव पाडत नाही. एकंदरीत चित्रपटाचा पूर्ण फोकस गौतमीपुत्र सातकर्णी याच नावावर आहे. 

चित्रपटाची सुरुवात होते कल्याणच्या युद्धाने. मध्यंतरात नहपणाविरुद्ध युद्ध होते आणि शेवट होतो तो दिमित्रीयस सोबतच या युद्धाने नहपणासोबतचे युद्ध इतिहासात सर्वात गाजलेले युद्ध होते. त्याची रंजकता फारशी जाणवत नाही. एकंदरीत दक्षिण भारतीय चित्रपट असल्यामुळे फिल्मी स्टाईल ची मारामारी आणि युद्ध या चित्रपटात ठासून भरलेली आहेत. चित्रपटातील एकूण 60 ते 70 टक्के भाग हा फक्त युद्ध आणि युद्धाचे व्यापलेला आहे. अखेरीस दिमित्रीयस यासोबतच युद्धही फिल्म पद्धतीने दाखवलेले आहे. सातकर्णीवर ग्रीक योद्धा अथेना विषप्रयोग करते व दुसऱ्या दिवशी तो दुपारी युद्धात फिल्मी स्टाईलने उठून परत सामील होतो. हे मात्र अतिरंजक वाटते. 'क्षहरात वन्स निर्वंश करत' असे वर्णन नाशिकच्या एका लेण्यांमध्ये गौतमीपुत्राच्या केले आहे. हे मात्र चित्रपटात उठून दिसते. हेही खरे आहे की, गौतमीपुत्राने ग्रीकांना हरवल्यानंतर कित्येक शतके भारतावर परकीय आक्रमण झाले नव्हते. त्याचे श्रेय सातवाहनांच्या राजाला द्यायलाच हवे.
सातवाहन मूळचे महाराष्ट्रातले असले तरी आंध्र वासियांनी ते आमचेच आहेत, असे दाखवले आहे. शिवाय इतिहासकारांनी हे सिद्ध केले आहे की, सातवाहनांची राजधानी पैठण या ठिकाणी होती. तरीही ती आंध्रप्रदेशातल्या अमरावती येथे दाखवण्यात आली आहे. शिवाय नहपानासोबतचे युद्ध महाराष्ट्र मध्ये नाशिक परिसरात झाले होते. ते सौराष्ट्रात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातल्या ऐतिहासिक चुका होत. सातवाहन हे बौद्ध धर्माचे उपासक होते व रक्षणकर्ते होते. त्यामुळे युद्धखोर म्हणून दाखवलेल्या गौतमिपुत्राला बौद्ध भिक्खूंच्या विरोध होता. परंतु त्याने बौद्ध भिक्खूंना दिलेले स्पष्टीकरण मात्र चुकीचे वाटते. एकंदरीत चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यापूर्वी दिग्दर्शकाने इतिहासकारांची मदत घ्यायला हवी होती. नुसती युद्ध टाकून कोणताही चित्रपट यशस्वी होत नाही. इतिहासकार तर हा चित्रपट केराच्या टोपलीत फेकून देतील असाच आहे.

चित्रपट ह्या युट्युब लिंकवर पाहू शकता:  https://www.youtube.com/watch?v=FhlsfkfZO38

Thursday, May 16, 2019

लेखक आम्ही नामधारी

पुढे लिहिण्यापूर्वी खरं सांगायचं तर नामधारी म्हणजे नाममात्र नाही तर 'नवीन नाव धारण करणारे' आहेत. मराठी भाषेमध्ये अनेक लेखक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात अर्थात प्रत्येकाला स्वतःचे मूळ नाव लावायची हौस असतेच असं नाही. मराठी कवींमध्ये मात्र ही प्रथा खूप जोरात दिसते. मीही जेव्हा लिहायला सुरुवात केली होती, त्यावेळेस माझं पूर्ण नाव सर्वप्रथम वापरलं होतं. तुषार भगवान कुटे अशा पूर्ण नावाने माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला होता. काही वृत्तपत्र वाले माझं मधलं नाव काढून टाकायचे. त्यामुळे मी तुषार भ. कुटे या नावाने लेख लिहायला सुरुवात केली. मराठीमध्ये अशा नावाने लेख लिहिण्याची परंपरा फारच क्वचित दिसते. त्यामुळे पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, ह. अ. भावे सारख्या नामवंत लेखक लेखकांकडून प्रेरणा घेऊन काही लेख मी तु. भ. कुटे या नावाने ही लिहिलेले आहेत. परंतु तरीही तुषार भ. कुटे या नावाचा मी सगळ्यात जास्त वापर केला. इंग्रजीमध्ये ही प्रसिद्ध झालेले माझे पहिले पुस्तक "कोअर जावा प्रोग्रामिंग : ए प्रॅक्टिकल अप्रोच" हे मी तुषार बी. कुटे याच नावाने लिहिलेले आहे. 'महाराष्ट्र हेराल्ड' या एकेकाळच्या इंग्रजी वृत्तपत्रासाठी मी नाव वापरलं होतं ...  K Tushar Bhagwan! काहीतरी वेगळं करायचं म्हणून तुषार पिंपरीपेंढारकर या नावाने सुद्धा मी लेख लिहिलेले आहेत. शिवाय एकदा सकाळ मध्ये कविता लिहिली होती ती 'के. तुषार' या नावाने प्रसिद्ध झाली आहे. माझा आवडता खेळाडू सौरभ गांगुली होता. त्याचंही नाव मी एकदा धारण करून तुषार गांगुली या नावाने लेख लिहिला होता!!! आपलं नाव सतत पेपर मध्ये प्रसिद्ध होत असल्यास त्याचे विशेष काही वाटत नाही. त्यामुळे कोणत्याही नावाने लेख लिहिला तरी तो प्रसिद्ध झाला, हे जास्त महत्त्वाचे होते. साधारणत: पंधरा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या दैनिक प्रभात मध्ये 'बाबुराव रामजी' या नावाने ही लेख लिहिलेले आहेत! हे माझ्या आजोबांचं नाव! आजही या नावाने मी लेख लिहित असतो.
शेक्सपिअरने म्हटलं आहे, नावात काय आहे? हे मराठीतले लेखक पुरेपूर जाणून आहेत. मीही त्यातलाच एक! कदाचित भविष्यात मी आणखी वेगळ्या नावांनी लिहित जाईन. शेवटी काय, लेखकाला आपले विचार पोहोचणे गरजेचे असते बाकी नाव कोणाचेही असो!